‘सेल्फी’ नव्हे तर ‘पोहण्याचा’ मोह ठरला काळ…उड्डाणपुलाजवळील खड्ड्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू; 

अमळनेर : शहरातील चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळ एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. उड्डाणपुलाच्या कामासाठी करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून तीन अल्पवयीन मित्रांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण अमळनेर शहरासह सिंधी कॉलनी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरमधील सिंधी कॉलनी भागात राहणारे तीन अल्पवयीन मित्र दुपारी पोहण्यासाठी चोपडा रोडवरील उड्डाणपुलाजवळील पाण्याने भरलेल्या मोठ्या खड्ड्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने पोहताना तिघेही खोल पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून तिघांनाही पाण्यातून बाहेर काढले आणि उपचारासाठी तात्काळ डॉ. अनिल शिंदे यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉ. संदिप जोशी यांनी तपासणी अंती तिघांनाही ‘मृत’ घोषित केले. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आणि शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे.

‘सेल्फी’ नाही, तर ‘पोहतानाच’ घडली दुर्घटना; नातेवाईकांनी केला खुलासा.

सुरुवातीला ही दुर्घटना ‘सेल्फी’ काढताना घडल्याची चर्चा शहरात रंगली होती आणि तशा बातम्याही वाऱ्यासारख्या पसरल्या. मात्र, मयत मुलांच्या नातेवाईकांनी या अफवांचे खंडन केले आहे.

नातेवाईकांचे म्हणणे:

मुलांचे मोबाईल खदाणीच्या बाहेरच व्यवस्थित ठेवलेले सापडले आहेत. तसेच, त्या मोबाईलमधील व्हिडिओंवरून हे तिघे मित्र तिथे केवळ पोहण्यासाठीच गेले असल्याचे स्पष्ट होत आहे.

दोन मित्र क्लासला गेल्याने वाचले:

दुर्घटना घडण्यापूर्वी या तिघांनी आपल्या इतर दोन मित्रांनाही सोबत येण्याचा आग्रह केला होता. मात्र, त्या दोघांनी पोहण्याऐवजी क्लासला जाणे पसंत केले. यामुळे या दोन मित्रांचे प्राण सुदैवाने वाचले, पण आपल्या तीन जिवलग मित्रांना गमावल्याचे दुःख त्यांना सहन करावे लागत आहे.

नातेवाईकांचा संतप्त सवाल: खदान मालकांचा निष्काळजीपणा जबाबदार?

या भीषण दुर्घटनेनंतर मयत मुलांच्या नातेवाईकांनी खदान मालक आणि प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. कायद्यानुसार अशा धोकादायक खदाणींच्या भोवती तार कंपाऊंड (कुंपण) घालणे आणि ‘धोकादायक क्षेत्र’ दर्शवणारे फलक लावणे बंधनकारक असते. मात्र, संबंधित ठिकाणी अशी कोणतीही सुरक्षा यंत्रणा नव्हती. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने खदान मालकांवर कडक कारवाई करावी आणि सुरक्षा फलक लावण्यास भाग पाडावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे नागरिकांना आवाहन:

पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी पाण्याने भरलेले खड्डे, तलाव, नद्या आणि खदाणींसारख्या धोकादायक ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे. आपल्या मुलांच्या हालचालींवर पालकांनी बारीक लक्ष ठेवावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!