अमळनेर : स्थानिक खांदेश शिक्षण मंडळाचे प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) एककातर्फे ‘वन महोत्सव’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासन व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या निर्देशानुसार १ ते ७ जुलै २०२६ या कालावधीत महाविद्यालयाच्या प्रांगणात हे विशेष वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक व महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव आणि कबचौ उमवि जळगावचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप बी. नेरकर यांच्या शुभहस्ते महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करून या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना प्र. प्राचार्य डॉ. एच. डी. जाधव यांनी वृक्षांचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की,“एक झाड लावा आणि हजारो जीव वाचवा. झाडे आपल्याला केवळ प्राणवायू, सावली आणि अन्नच देत नाहीत, तर स्वच्छ पर्यावरणही बहाल करतात. आज आपण लावलेले हे छोटेसे रोप उद्या मोठे वृक्ष बनून पुढील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरेल.”
