अमळनेर : स्थानिक न्यायालय आवारात नव्याने बांधण्यात आलेल्या उपहारगृह (कॅन्टीन) इमारतीच्या बांधकामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून, ती सद्यस्थितीत पूर्णपणे असुरक्षित असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमळनेर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गोपाल शालिकराव सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील तपासणी समितीने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अनागोंदी कारभाराची पोलखोल झाली आहे. या संदर्भात बार असोसिएशनने मा. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्याकडे वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करून, त्रुटी दूर होईपर्यंत इमारतीचा ताबा न घेण्याची आग्रही मागणी केली आहे.

माहितीनुसार, मा. न्यायालयाच्या निर्देशानुसार आज या नूतन इमारतीची संयुक्त प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह सहाय्यक अधीक्षक श्री. एस. आर. पाटील, प्रभारी अधीक्षक श्री. बी. एस. पांडव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता श्री. घनश्याम सोनवणे व अन्य वकील बांधव उपस्थित होते.

तपासणी अहवालातील प्रमुख तांत्रिक दोष आणि त्रुटी:
समितीने केलेल्या बारकाईने पडताळणीत इमारतीच्या अंतर्गत व बाह्य भागात अनेक गंभीर दोष आढळून आले आहेत:
खचलेली फरशी व हलते ओटे: इमारतीच्या आतील फरशीचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने जमीन खाली खचली आहे. त्यामुळे फरशांना मोठे तडे गेले असून त्या उखडल्या आहेत. तसेच, ग्राहकांसाठीचे व सर्व्हिस काउंटरचे ‘कडप्पा’ ओटे मजबूत पायावर नसल्याने ते हलत असून कधीही कोसळण्याची शक्यता आहे.
विजेविना अंधारात इमारत: अंतर्गत वायरिंग व उपकरणे बसवली असली, तरी अद्याप अधिकृत वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. त्यामुळे वायरिंग सुरक्षित आहे की नाही, हे तपासणे अशक्य झाले आहे.
गच्चीवर जाण्यास शिडीच नाही, छताला गळती: इमारतीच्या छतावर (टेरेस) जाण्यासाठी कोणतीही शिडी लावण्यात आलेली नाही. त्यामुळे समितीला गच्चीवर जाता आले नाही व पाण्याच्या टाकीची पडताळणी करता आली नाही. त्यातच, वॉटरप्रूफिंग न केल्यामुळे छताला आतील बाजूने पाण्याचे मोठे डाग व ओलावा दिसून येत आहे.
सांडपाण्याची व बाह्य परिसराची दुरवस्था: उपहारगृहाच्या सांडपाण्याची वाहिनी मुख्य ड्रेनेजला जोडलेली नाही. तसेच इमारतीबाहेरील जमीन असमतोल असून तिथे मोठे खड्डे पडले आहेत. शेजारील मोठ्या झाडांच्या फांद्या थेट भिंतींवर घासल्या जात असल्याने भिंतींना तडे जात आहेत.
बार असोसिएशनच्या प्रमुख मागण्या:
“जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्व त्रुटी युद्धपातळीवर दुरुस्त करत नाही, तोपर्यंत ही इमारत वापरण्यास योग्य नाही. दुरुस्त्या पूर्ण करून गुणवत्तेचा दाखला मिळेपर्यंत न्यायालयीन प्रशासनाने या इमारतीचा ताबा घेऊ नये.” — ॲड. गोपाल सोनवणे (अध्यक्ष, अमळनेर बार असोसिएशन)
