विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची भीती! १२ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवर अमळनेरच्या आमदारांनी उठवला आवाज.

     अमळनेर:राज्य शासनाने इयत्ता ११ वी पाठोपाठ २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२ वीची प्रवेश प्रक्रियाही ऑनलाईन केली आहे. मात्र, या नव्या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्वातंत्र्यावर मर्यादा येत असल्याचा गंभीर मुद्दा आता ऐरणीवर आला आहे. ११ वी विज्ञान (Science) शाखेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये कला (Arts) किंवा वाणिज्य (Commerce) शाखेत प्रवेश घेण्याची संधी या ऑनलाईन पद्धतीमुळे पूर्णतः बंद झाली आहे.

​या संदर्भात अमळनेरचे आमदार तथा माजी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना थेट निवेदन दिले असून, पूर्वीप्रमाणे विद्यार्थ्यांना १२ वीमध्ये शाखा बदलाची (Stream Change) मुभा देण्याची आग्रही मागणी केली आहे.


नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे लवचिकता संपली

आमदार अनिल पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे की, २०२५ पूर्वी असलेल्या ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेत ११ वी विज्ञाननंतर १२ वीला कला किंवा वाणिज्य शाखेत सहज प्रवेश घेता येत होता. तसेच ११ वी वाणिज्यनंतर १२ वी कला शाखेतही प्रवेशाची उत्तम सुविधा उपलब्ध होती. मात्र, शासनाच्या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे ही शैक्षणिक लवचिकता पूर्णतः संपुष्टात आली आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फटका; नैराश्याची भीती

“ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे महागडे खासगी क्लासेस लावू शकत नाहीत. बऱ्याचदा ११ वीत प्रवेश घेतल्यावर विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम झेपत नसल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते. अशा वेळी अनेकजण १२ वीला कला किंवा वाणिज्य शाखा निवडू इच्छितात. मात्र, आताच्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे त्यांच्यासमोर मोठे अडथळे निर्माण झाले असून, यामुळे विद्यार्थी नैराश्याच्या गर्तेत जाण्याची भीती आहे,” अशी चिंता आमदार पाटील यांनी व्यक्त केली.

शासनाने सकारात्मक निर्णय घेण्याची गरज

​विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्या भविष्याचा विचार करून, शासनाने पूर्वीप्रमाणेच ११ वी विज्ञान शाखेनंतर १२ वी कला किंवा वाणिज्य शाखेत प्रवेश देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच याबाबत शिक्षण विभागाला आवश्यक ते निर्देश तात्काळ द्यावेत, अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.

शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मतेही, विद्यार्थ्यांच्या क्षमतेनुसार आणि आवडीनुसार शाखा निवडण्याचे स्वातंत्र्य अबाधित राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे शासन यावर लवकरात लवकर काय निर्णय घेते, याकडे आता विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!