अमळनेर तालुक्यात खळबळ: गडखांब शिवारात साडेतीन कोटींचा गांजा जप्त; ‘जगाच्या पोशिंद्या’वर अटकेची वेळ

     अमळनेर: तालुक्यातील गडखांब शिवारात अंमली पदार्थांच्या शेतीवर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. शेतातील कापसाच्या आड लपवलेला तब्बल ३ क्विंटल गांजा पोलिसांनी हस्तगत केला असून, बाजारभावाप्रमाणे याची किंमत साडेतीन कोटी रुपयांच्या घरात आहे. याप्रकरणी गट क्र. २३२४ मधील शेतकरी सुरेश पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहिती अन् पहाटेचा छापा

​       अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गडखांब शिवारात गांजाची मोठी लागवड झाल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेतली. पंचासमक्ष कारवाई करण्यासाठी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनाही पाचारण करण्यात आले. ७ फेब्रुवारी रोजी पहाटे ६ वाजता पोलिसांनी या शेतावर सर्जिकल स्ट्राईक केला.

मोठी पोलीस फौज तैनात

​    या कारवाईसाठी पोलीस निरीक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठे पथक तयार करण्यात आले होते. यामध्ये:

अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ, शरद काकळीज, नामदेव बोरकर.

अंमलदार: हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, विनोद संदानशिव, प्रशांत पाटील, निलेश मोरे, नितीन मनोरे, सुनील तेली, विनोद सोनवणे, राहुल पाटील, उदय बोरसे, सिद्धांत शिसोदे, गणेश पाटील, संजय सोनवणे, श्यामल पारधी, निलेश पाटील आणि विनोद पाटील.

​    या संपूर्ण पथकाने शेताची वेढाबंदी करून कपाशीच्या आड लपवलेली गांजाची झाडे शोधून काढली.सदर गांजाचे सर्व झाडे पोलिसांनी उपटून काढले.

कारवाईची ठळक वैशिष्ट्ये:

ठिकाण: गडखांब शिवार, अमळनेर (गट क्र. २३२४)

​आरोपी शेतकरी: सुरेश पाटील, सुरेश पावरा, सचिन पावरा 

​जप्त मुद्देमाल: ३ क्विंटल गांजा (३०० किलो)

​अंदाजित किंमत: ३.५ कोटी रुपये

​हताश शेतकरी आणि गुन्हेगारीचा रस्ता

​      जगाचा पोशिंदा समजला जाणारा शेतकरी अशा गुन्हेगारी मार्गाकडे का वळला, याची चर्चा आता संपूर्ण अमळनेर तालुक्यात रंगली आहे. सततची नापिकी, निसर्गाचा लहरीपणा आणि कर्जबाजारीपणामुळे सुरेश पाटील याने कमी वेळात जास्त पैसा कमवण्यासाठी हा धोकादायक मार्ग निवडल्याचे प्राथमिक चर्चेतून समोर येत आहे. मात्र, साडेतीन कोटींचा माल पिकवून श्रीमंत होण्याचे त्याचे स्वप्न आता पोलीस कोठडीपर्यंत पोहोचले आहे.

​नागरिकांचा सवाल: पोशिंद्याला गुन्हेगार कुणी बनवलं?

​     पोलिसांनी कायद्यानुसार आपली कारवाई केली असली, तरी सर्वसामान्य नागरिक मात्र शेतकऱ्याच्या या हतबलतेवर हळहळ व्यक्त करत आहेत. “शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळाला असता, तर त्याला आपल्या काळजासारख्या मातीत हे ‘विष’ पेरण्याची वेळ आली असती का?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

पोलिसांची भूमिका 

​    “अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) आरोपी सुरेश पाटील सह सचिन पावरा, सुरेश पावरा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामागे आणखी कुणाचे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!