आमदार अनिल पाटील यांचे आरोप म्हणजे खोटी बदनामी; माजी आमदार शिरीष चौधरी यांचा पत्रकार परिषदेत घणाघाती पलटवार

अमळनेर: “आमदार अनिल पाटील हे माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी आपले चाटमारे धंदे बंद करावेत,” असा थेट आणि घणाघाती हल्ला शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना चढवला.

नंदुरबार नगरपालिकेच्या ९ कोटी रुपयांचा निधी स्वतःसाठी वापरल्याच्या आरोपाचा खरपूस समाचार घेत चौधरी म्हणाले, “शासनाने मंजूर केलेला हा निधी अद्याप मिळालेलाच नाही. शिवाय, असा निधी कधीही वैयक्तिक खात्यावर येत नसून तो संबंधित शासकीय कार्यालयाच्या खात्यावर जमा होतो. वस्तुस्थिती ही असताना केवळ अपप्रचार करून दबाव आणण्याचे राजकारण सुरू आहे.”

पोलीस प्रशासनावर आणि आमदारांवर गंभीर आरोप

पत्रकार परिषदेत बोलताना शिरीष चौधरी यांनी तत्कालीन पोलीस अधिक्षक श्रावण दत्त आणि स्थानिक आमदारांवर संगनमत करून खोट्या केसेस दाखल केल्याचा आरोप केला. “विरोधी कार्यकर्त्यांवर दबाव टाकून त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा हा कुटील प्रयत्न होता,” असे ते म्हणाले.

आमदारांच्या आश्वासनांची पोलखोल करताना चौधरी म्हणाले:

“निवडून आल्यावर अवैध धंदे आणि रेतीचे डंपर बंद करू, असे दावे आमदारांनी केले होते. मात्र आज त्यांच्याच ठेक्यातील डंपरखाली अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे, हा एक प्रकारे खूनच आहे. आमदारांच्या ‘आर बी कन्स्ट्रक्शन’च्या दमोता माता स्टोनक्रेशरमध्ये मोठ्या प्रमाणात रेती दाबून ठेवली आहे.”

सामान्य कार्यकर्त्यावर खोटी एट्रोसिटी दाखल केल्याचा दावा

स्टोनक्रेशरच्या गैरकारभाराबाबत सामान्य कार्यकर्ते अनंत निकम यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली होती. या तक्रारीनंतर औरंगाबाद येथील अधिकारी इंगळे साहेब तसेच अमळनेरचे शहरी व ग्रामीण तलाठी प्रत्यक्ष चौकशीसाठी आले होते.

चौकशीदरम्यान आमदारांनी २० ते २५ गावगुंड गोळा केले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून निकम यांनी ‘११२’ क्रमांकावर फोन करून तसेच पोलीस अधीक्षकांना माहिती देऊन पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या उपस्थितीनंतरही आमदारांनी दबाव आणून अनंत निकम यांच्यावर खोटी एट्रोसिटीची केस दाखल करण्यास भाग पाडले, असा खळबळजनक आरोप चौधरी यांनी केला.

उपस्थित केलेले प्रमुख प्रश्न:

पोलीस दबावात?  पोलिसांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जर काही घडलेच नाही, तर मग गुन्हा कसा दाखल झाला? पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत?

पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा:  दिवसभर पोलिसांसोबत असलेल्या व्यक्तीवरच गुन्हा कसा दाखल होतो? त्यामुळे संबंधित पोलिसांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

मराठा कार्डचा वापर:  निवडणुकीच्या वेळी मराठा कार्ड वापरून विजय मिळवायचा आणि नंतर मराठा समाजातील तरुणांवरच खोट्या एट्रोसिटीच्या केसेस टाकायच्या, हा कोणता न्याय?

अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचा आरोप:  मंत्री बावनकुळे यांनी चौकशीचे आदेश दिले असताना आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘मॅनेज’ करून तपास भरकटवला.

माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि थेट आरोपांमुळे अमळनेर व स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!