गांजा जप्त करणाऱ्या ‘कर्तव्यदक्षां’ना शेतकऱ्याचा सवाल: “रोज होणारी ५० लाखांची लूट थांबवाल का?….. रमेश पाटील, गावरानी जागल्या

      अमळनेर : गडखाब शिवारात साडेतीन कोटींचा गांजा पकडणाऱ्या पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या ‘तत्परते’चे सर्वत्र कौतुक होत असतानाच, दुसरीकडे याच गावातील एका जागृत शेतकऱ्याने प्रशासकीय डोळे उघडणारा सवाल केला आहे. “गुन्हा करणाऱ्यावर तत्परतेने कारवाई करणारे अधिकारी, बाजार समितीत दररोज होणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाखो रुपयांच्या लुटीकडे दुर्लक्ष का करतात?” असा खळबळजनक प्रश्न गडखांब येथील शेतकरी रमेश व्यंकट पाटील यांनी उपस्थित केला आहे.

​नेमके गणित काय? लुटीचा आकडा पाहून चक्रावून जाल!

​   रमेश पाटील यांनी प्रेस नोटद्वारे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील धक्कादायक वास्तव मांडले आहे:

शासकीय नियम: १२% आद्रता असलेल्या मक्याला प्रतिक्विंटल २४०० रुपये दर देणे बंधनकारक आहे.

प्रत्यक्षातील स्थिती: बाजार समितीत हाच मका सर्रास १४०० ते १६०० रुपयांनी खरेदी केला जात आहे.

​प्रतिक्विंटल नुकसान: शेतकऱ्याची दर क्विंटलमागे ८०० ते ९०० रुपयांची लूट होत आहे.

​दैनंदिन लुट: रोजची ६,००० क्विंटल आवक गृहीत धरली, तर दररोज शेतकऱ्यांच्या खिशातून ५० लाख रुपये ओरबाडले जात आहेत.

अतिवृष्टी सोसली, आता सुलतानी संकट का?

​       शेतकरी सुरेश लोटन पाटील यांच्यावर झालेल्या कारवाईचा संदर्भ देत रमेश पाटील म्हणाले की, “माझ्या शेतकरी भावाने जो गुन्हा केला, त्यावर नियमानुसार कारवाई झालीच पाहिजे, त्याबद्दल दुमत नाही. पण त्याच कर्तव्यदक्षतेने अधिकारी शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाकडे का पाहत नाहीत? अतिवृष्टी, वादळ आणि निसर्गाच्या संकटातून वाचवून शेतकऱ्याने आणलेला माल कवडीमोलाने विकला जात असताना हे अधिकारी गप्प का?”

प्रशासकीय ‘तत्परते’चे रहस्य काय?

​        गांजा पकडण्यासाठी पहाटे ६ वाजता धाड टाकणारे अधिकारी, बाजार समितीत शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा लुटला जात असताना नेमके कोणाचे हित जोपासत आहेत? या ‘दुर्लक्षाचे’ रहस्य काय? असा बोचरा सवालही त्यांनी केला आहे. भारतीय संविधानातील तरतुदींनुसार प्रत्येक नागरिकाला न्यायाचा हक्क आहे, याकडे त्यांनी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, डीवायएसपी विनायक कोते आणि पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचे लक्ष वेधले आहे.

जागृत शेतकऱ्याची विनंती

     ​“मी एक भारतीय नागरिक आणि गडखांबचा जागृत शेतकरी या नात्याने विनंती करतो की, जशी तत्परता गांजा जप्त करण्यात दाखवली, तशीच तत्परता मका आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळवून देण्यात दाखवावी. ही दररोजची ५० लाखांची लूट थांबवून अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा.”

— रमेश व्यंकट पाटील, कार्य. सदस्य, गावरानी जागल्या, गडखांब.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!