अमळनेर : अमळनेरकरांच्या आरोग्याशी निगडित असलेला आणि गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला जलकुंभांच्या (पाण्याच्या टाक्या) साफसफाईचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय नियोजनाच्या जोरावर शहरात शुद्ध पाणीपुरवठ्याची ऐतिहासिक मोहीम हाती घेण्यात आली आहे. मागील आठवड्यात कोर्टमागील जलकुंभ यशस्वीरित्या साफ केल्यानंतर, आता तांबेपुरा जलकुंभाच्या स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्वच जलकुंभ चकाचक केले जाणार आहेत.

