अमळनेर : मृत्यूनंतर तरी माणसाला सन्मान मिळेल ही अपेक्षा असते, मात्र अमळनेर नगरपालिकेच्या संवेदनशून्य कारभारामुळे अमरधाम स्मशानभूमीत मृतांच्या सुळसुळीत विटंबनेचा अत्यंत धक्कादायक आणि अमानुष प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी पालिकेकडून अपुरे सरण दिले जात असल्याने मृतदेह अर्धवट जळत आहेत आणि रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांकडून या अर्धवट जळालेल्या मृतदेहांची विटंबना केली जात असल्याचे विदारक वास्तव उघड झाले आहे. या प्रकारामुळे अमळनेर शहरातील सुजान नागरिकांमधून प्रचंड संताप आणि तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
अमरधाममधील या भोंगळ कारभारावर प्रभाग क्र. ३ च्या नगरसेविका शोभा गढरे यांनी तीव्र संताप व्यक्त करत थेट प्रशासनाला धारेवर धरले आहे.

ना गोवऱ्या, ना पुरेसे लाकूड; अंत्यविधी बनली ‘औपचारिकता’!
अमरधामात अंत्यविधीसाठी अत्यंत कमी प्रमाणात गोवऱ्या आणि सरण उपलब्ध करून दिले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मृतदेह पूर्णपणे जळण्यासाठी आवश्यक असलेले साहित्यच मिळत नसल्याने अनेक अंत्यसंस्कार अपूर्ण राहत आहेत. पालिका प्रशासनाकडून कोणतीही मदत न मिळाल्याने दुःखा डोंगराखाली दबलेल्या नातेवाईकांनाच सरण रचण्यापासून ते अंत्यविधीपर्यंतची सर्व कामे स्वतः करावी लागत आहेत, कारण या पवित्र ठिकाणी पालिकेचा एकही कायमस्वरूपी कर्मचारी उपलब्ध नाही.

