अमळनेर :तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नागरिकांना जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना २९ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरूम टाकण्याच्या वादातून दिली धमकीमिळालेल्या माहितीनुसार, तळवाडे गावातील शेतशिवारात पाईपलाईनचे काम सुरू होते. त्या ठिकाणी निघालेला मुरूम शिवाजी लोटन पाटील हा ट्रॅक्टरद्वारे दुसरीकडे टाकत होता. त्यावेळी फिर्यादी रेखा अरुण वाघ यांचे पती अरुण वाघ, दिर प्रवीण वाघ, संजय वाघ, लालचंद भिल व यशोदाबाई भिल यांनी, “इकडे-तिकडे टाकण्यापेक्षा नवनाथ बल्ल्यावर असलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाका,” असे सांगितले.
याचा राग आल्याने शिवाजी पाटील याने, “तुम्हा मातंग व भिल्लांना मुरूम टाकून देणार नाही, इथे बल्ल्यावर राहू देणार नाही, ट्रॅक्टरखाली चिरडून टाकू,” अशी धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली.

