अमळनेर: महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग, गृह विभाग, पोलीस प्रशासन आणि येथील ‘आधार बहुदेशीय संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्या पोलीस स्टेशन (तहसील कार्यालय परिसर) येथे चालविले जाणारे महिला समुपदेशन केंद्र पीडित महिलांसाठी खऱ्या अर्थाने दिलासादायक ठरत आहे. मागील वर्षभरात केंद्राकडे आलेल्या १५१ तक्रारींपैकी तब्बल ९१ कुटुंबांमधील वाद आणि गैरसमज मिटवून त्यांना एकत्र आणण्यात समुपदेशकांना यश आले आहे.

विविध समस्यांवर मिळतेय एकाच छताखाली मदत
या केंद्रात समाजकार्य शाखेतील पदव्युत्तर (MSW) प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत असून, त्यांच्यामार्फत महिलांवर होणारा कौटुंबिक हिंसाचार, घरगुती वाद, भावनिक ताणतणाव, आर्थिक छळ, मुलांचा ताबा न मिळणे, शारीरिक व मानसिक त्रास, व्यसनाधीनतेमुळे होणारे वाद, तसेच घरातून हाकलून देणे अशा विविध समस्यांवर प्रभावी समुपदेशन केले जाते. केवळ सल्लाच नव्हे तर प्रत्यक्ष मदत, संदर्भ सेवा आणि कायदेशीर मार्गदर्शनही येथे मोफत उपलब्ध करून दिले जाते.

अल्पवधीत पुनर्वसनाचे मोठे कार्य
अडचणीत सापडलेल्या महिलांना तात्काळ दिलासा देण्यासाठी केंद्रामार्फत खालील सेवा पुरविल्या जातात:
कायदेशीर व वैद्यकीय मदत: कायदेशीर मार्गदर्शन आणि गरजूंना मोफत सरकारी वकील मिळवून देणे.
आश्रयाची सोय: पीडित महिलांसाठी तात्पुरत्या निवारा गृहाची व्यवस्था करणे.
शासकीय योजना: महिलांशी संबंधित विविध शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती देऊन त्यांचा लाभ मिळवून देणे.
ग्रामीण व शहरी भागात जनजागृतीवर भर
महिलांना त्यांच्या हक्कांची आणि कायद्यांची माहिती व्हावी म्हणून समुपदेशन केंद्रामार्फत ग्रामीण तसेच शहरी भागात कायदेविषयक हस्तपत्रकांचे वाटप केले जाते. याशिवाय, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन तरुण-तरुणींसाठी विवाहपूर्व समुपदेशन सत्रे आयोजित केली जातात. यात कक्षाच्या कामकाजाची माहिती आणि हेल्पलाईन नंबरबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.
वार्षिक कामगिरीचा संक्षिप्त आढावा
एकूण नोंदविलेल्या तक्रारी: १५१
समुपदेशनाने एकत्र आलेली कुटुंबे: ९१
न्यायालयीन व कायदेशीर मदतीसाठी पाठविलेल्या महिला: ३०
यांचे लाभले मार्गदर्शन व सहकार्य
या केंद्राच्या यशस्वी वाटचालीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी ऋषिकेश काळे व त्यांचे सहकारी, स्थानिक पोलीस प्रशासन, आधार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. भारती पाटील, आणि सचिव प्रा. विजयकुमार वाघमारे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. केंद्रामध्ये समुपदेशक म्हणून श्रीमती रेणू प्रसाद व श्रीमती ज्ञानेश्वरी पाटील या अत्यंत कौशल्याने जबाबदारी सांभाळत आहेत.
अवाहान:
आपल्या परिसरात किंवा ओळखीत कोणत्याही महिलेला कौटुंबिक वा मानसिक त्रास असल्यास, त्यांनी कसलाही संकोच न बाळगता या केंद्राशी संपर्क साधावा.संपर्क क्रमांक: ७९७२३३९५६६ (7972339566)
