अमळनेर : तालुक्यातील गांधली ग्रामपंचायतीने गृहनिर्माण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. शासनाच्या महा आवास अभियानांतर्गत, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) सन २०२३-२४ मध्ये गांधली ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर “सर्वोत्कृष्ट गृह संकुल” या श्रेणीत तृतीय क्रमांकाचा बहुमानाचा पुरस्कार पटकावला आहे.

सातारा येथे आयोजित एका भव्य राज्यस्तरीय सोहळ्यात हा पुरस्कार अत्यंत दिमाखात प्रदान करण्यात आला.
दिग्गजांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा
हा मानाचा पुरस्कार केंद्रीय मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री श्री. शंभूराज देसाई, माननीय खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

गांधली ग्रामपंचायतीच्या वतीने हा पुरस्कार अमळनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (BDO) श्री. एन. आर. पाटील, गांधलीचे सरपंच श्री. भैय्यासाहेब नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत अधिकारी श्री. प्रमोद पाटील, श्री. गुणवंत सोनवणे आणि श्री. नितीन पाटील यांनी स्वीकारला.
वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि कौतुकाची थाप
गांधली येथील घरकुल योजनांच्या प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) करणवाल मॅडम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सोमवंशी साहेब तसेच प्रकल्प संचालक लोखंडे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करिष्मा नायर मॅडम यांनी गांधली ग्रामपंचायतीचे विशेष अभिनंदन केले आहे.
सामूहिक प्रयत्नांचे यश
“हा पुरस्कार म्हणजे केवळ एका व्यक्तीचे यश नसून, गांधली येथील घरकुल लाभार्थी, ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, घरकुल कक्षातील अभियंते आणि ऑपरेटर यांच्या सामूहिक परिश्रमाचे फळ आहे,” अशी भावना यावेळी सरपंच भैय्यासाहेब पाटील व अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
