अंमळनेरच्या स्त्री शिक्षणाची ‘रुक्मिणी’: नानासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचा झाला वटवृक्ष!

    अंमळनेर | ग्रामीण भागातील महिलांनी उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहावे, या उदात्त हेतूने माजी केंद्रीय मंत्री नानासाहेब विजय नवल पाटील यांनी १९८९ मध्ये अंमळनेर येथे पाहिलेले स्वप्न आज ३५ वर्षांनंतर सत्यात उतरले आहे. नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित रुक्मिणीताई महिला महाविद्यालयाने प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत शेकडो महिलांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पोहचवला आहे.

प्रवाहाबाहेरील महिलांना शिक्षणाची संधी

     एकेकाळी दहावी-बारावी झाली की मुलींचे लग्न लावून दिले जाई. संसार, मुले आणि घरगुती जबाबदाऱ्यांमुळे अनेक महिलांचे शिक्षण अर्धवट सुटायचे. मात्र, अशा ‘ड्रॉप आऊट’ झालेल्या महिलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम या महाविद्यालयाने केले. केवळ ३५ विद्यार्थिनींपासून सुरू झालेला हा प्रवास आज ३५० विद्यार्थिनींपर्यंत पोहोचला आहे.

बाळासाहेब अनिकेत पाटील यांच्या प्रयत्नांतून ‘एम.ए.’ची सुविधा

    विद्यार्थिनींना केवळ पदवीपर्यंत मर्यादित न ठेवता, त्यांना पदव्युत्तर शिक्षण मिळावे यासाठी माननीय बाळासाहेब अनिकेत विजय पाटील (सिनेट सदस्य, SNDT महिला विद्यापीठ, मुंबई) यांनी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे महाविद्यालयात सर्व विषयांचे ‘एम.ए.’ (M.A.) सुरू झाले, ज्यामुळे तालुक्यातील अनेक महिला उच्चशिक्षित होऊन मोठ्या पदांवर कार्यरत झाल्या आहेत.

यशाची उंच भरारी: पोलीस दलापासून ते राजकारणापर्यंत

    या महाविद्यालयाचे यश आज चोहीकडे पाहायला मिळत आहे. येथून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी आज:

    पोलीस इन्स्पेक्टर, पोलीस उपनिरीक्षक आणि शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

    राजकीय क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्या, नगरपालिका सदस्य म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत.

अनेक महिला सामाजिक क्षेत्रातही नाव लौकिक मिळवत आहेत.

जिद्द आणि चिकाटीचे मूर्तिमंत उदाहरण

     महाविद्यालयाचे सामाजिक भान केवळ पदवी वाटण्यापुरते मर्यादित नाही. नुकतेच परीक्षेच्या दरम्यान एक हृदयस्पर्शी चित्र समोर आले. दोन्ही पायांनी अपंगत्व असलेल्या एका विद्यार्थिनीने जिद्दीने प्रवेश घेऊन पदवी पूर्ण करण्यासाठी घेतलेली धाव सर्वांना थक्क करणारी आहे. इतकेच नव्हे तर, एकाच कुटुंबातील सासू आणि सून, मामा आणि त्याच्या दोन भाच्या अशा अनोख्या जोड्या येथे एकत्र शिक्षण घेत आहेत. समाजातील त्रस्त आणि वंचित घटकांना शिक्षणाची दारे उघडी करून देऊन महाविद्यालय खऱ्या अर्थाने समाज परिवर्तन घडवत आहे.

   “नानासाहेबांनी लावलेल्या या शैक्षणिक रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्नांमुळेच आज ग्रामीण भागातील महिला उच्च पदांवर पोहोचू शकल्या आहेत.”

— प्राचार्य डॉ. शेख एस. जे. (रुक्मिणीताई महिला महाविद्यालय, अंमळनेर)

     अंमळनेर तालुक्याच्या शैक्षणिक इतिहासात रुक्मिणीताई महिला महाविद्यालयाचे योगदान हे सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखे असून, भविष्यातही हे ज्ञानदान अविरत सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!