सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन १० मार्च हा दिवस भारतीय समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचा महत्त्वपूर्ण दिवस आहे. स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे उघडणाऱ्या या महान समाजसुधारक, शिक्षिका आणि कवीच्या योगदानाला सलाम करण्याचा हा दिवस आहे.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. अवघ्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्यासोबत झाला. जोतीरावांनी सावित्रीबाईंना शिक्षण दिले आणि त्यानंतर त्यांनी स्वतः शिक्षिका होण्याचा निर्धार केला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे म्हणजे मोठे पाप मानले जात असे, पण सावित्रीबाईंनी समाजाच्या विरोधाला न जुमानता १८४८ साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
शिक्षण देताना त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. लोक त्यांच्यावर दगडफेक करत, चिखलफेक करत, पण त्या विचलित झाल्या नाहीत. त्यांनी आपल्या कार्याचा विस्तार करत १८५१ पर्यंत १८ शाळा सुरू केल्या.
सावित्रीबाईंनी फक्त शिक्षणच नव्हे, तर समाजातील अनेक रूढी-परंपरांविरुद्ध आवाज उठवला. त्या विधवांसाठी पुनर्विवाहाचा प्रचार करत. त्यांनी गर्भवती विधवांसाठी आश्रयगृहे सुरू केली. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी “बालहत्याबंदीगृह” स्थापन केले, जिथे समाजाने वाळीत टाकलेल्या मुलांना आधार मिळत असे.
त्यांनी स्त्रियांवरील अन्याय, सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या अत्याचारांविरोधात संघर्ष केला. त्यांचा प्रत्येक प्रयत्न समाजात समानता आणण्यासाठी होता.
सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिका आणि समाजसुधारक नव्हत्या, तर त्या प्रतिभासंपन्न कवयित्रीही होत्या. त्यांचे अनेक काव्यसंग्रह सुपरिचित आहेत. त्यांच्या कवितांमध्ये स्त्रीशक्ती, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक समतेचा संदेश आहे.
१८९७ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली असता, सावित्रीबाईंनी रुग्णांची सेवा करण्यासाठी मदत केंद्र सुरू केले. लोकांना औषधोपचार मिळावे म्हणून त्या स्वतः प्लेगग्रस्त रुग्णांना घेऊन जात असत. या सेवाकार्यात त्यांना प्लेगची लागण झाली आणि १० मार्च १८९७ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
आज सावित्रीबाई फुले यांचा वारसा संपूर्ण देशात प्रेरणादायी ठरला आहे. स्त्रीशिक्षण, सामाजिक समता आणि स्त्रीसक्षमीकरणासाठी त्यांनी लावलेली ज्ञानज्योत आजही तेजाने उजळत आहे.
सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या महान कार्याला कोटी कोटी वंदन….!
