अमळनेर: “राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे केवळ एक राजे नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने सामाजिक लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ होते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. लीलाधर पाटील यांनी केले. रुक्मिणीताई कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात आयोजित ‘छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आणि सामाजिक कार्य’ या विषयावरील एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेत ते बीजभाषक म्हणून बोलत होते.

प्रमुख मान्यवरांची उपस्थिती
या राष्ट्रीय परिषदेच्या अध्यक्षस्थानी नवलभाऊ प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी डी. बी. पाटील हे होते. तर व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जे. शेख, बीजभाषक प्रा. डॉ. लीलाधर पाटील, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. राहुल निकम, प्रा. अशोक पवार, अशोक बिऱ्हाडे आणि उमेश काटे प्रामुख्याने उपस्थित होते.
या परिषदेसाठी संस्थेचे मानद संचालक सुनील गरुड हे काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांनी परिषदेला लेखी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. त्यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन प्रा. सुनील वाघमारे यांनी केले.

