वीरवाडे येथील चिमुरडीवर अत्याचार व खून प्रकरणातील नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप; ……सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे ७३ वी जन्मठेप यशस्वी!

अमळनेर / चोपडा :चोपडा तालुक्यातील विरवाडे गावात अवघ्या महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या एका अत्यंत भयावह आणि क्रूर घटनेतील आरोपी अंकेश उर्फ अनिकेश पुन्या बारेला (वय २२, रा. पाटचारी) याला न्यायालयाकडून ‘मरेपर्यंत जन्मठेपेची’ कठोर शिक्षा सुनावण्यात आली आहे. या खटल्यात अमळनेरचे सुप्रसिद्ध सरकारी वकील ॲड. किशोर बागुल (मंगरूळकर) यांनी ठोस कायदेशीर पुरावे आणि प्रभावी युक्तिवाद सादर करत आरोपीला त्याच्या कृत्याची पूर्ण शिक्षा मिळवून दिली. या निकालासोबतच ॲड. किशोर बागुल यांनी आपल्या न्यायालयीन कारकिर्दीत तब्बल ७३ वी जन्मठेपेची शिक्षा मिळवून देण्याची ऐतिहासिक व विक्रमी कामगिरी केली आहे.

काय आहे संपूर्ण घटना?

दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी फिर्यादी यांच्या मुली शेतात निंदणीच्या (खुरपणीच्या) कामासाठी गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास त्यातील तीन मुली अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत रडत रडत घरी परतल्या. त्यांनी कुटुंबीयांना सांगितले की, आरोपी अंकेश बारेला याने त्यांच्या लहान बहिणीला बळजबरीने शेतात ओढून नेले आहे. या धक्कादायक माहितीनंतर नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मुलीचा शोध सुरू केला.

पुढील शोधादरम्यान, भगवान गोटू पाटील यांच्या कपाशीच्या शेतात ती निष्पाप पिडीत मुलगी अत्यंत विदारक आणि मृतावस्थेत आढळून आली. तिच्या डोक्यावर गंभीर आणि जीवघेण्या जखमा होत्या, तसेच घटनास्थळावर रक्ताचे सडे पडलेले होते.

तपास आणि वैज्ञानिक पुरावे

चोपडा शहर पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ४५४/२०२४, स्पेशल केस नं. ५७/२0२४ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६५, ६६, १०३(१) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम ४, ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस तपासात नराधम आरोपीने पीडितेवर अमानुष बलात्कार करून तिचा निर्घृण खून केल्याचे स्पष्ट झाले.

न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. के. आर. बागुल यांनी एकूण १४ महत्त्वपूर्ण साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवली. यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी लहान मुली आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. यासोबतच डीएनए (DNA) अहवाल, वैद्यकीय तपासणी अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि आरोपीच्या कपड्यांवर आढळलेले पीडितेचे रक्त यांसारखे भक्कम वैज्ञानिक पुरावे ॲड. बागुल यांनी न्यायालयासमोर सिद्ध केले.

न्यायालयाचा कठोर निकाल आणि आर्थिक मदत

गुन्ह्याचे अत्यंत गंभीर आणि क्रूर स्वरूप पाहता सरकारी वकील ॲड. किशोर बागुल यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून, माननीय जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती सी. व्ही. पाटील यांनी आरोपी अंकेश बारेला याला “मरेपर्यंत जन्मठेप” (आयुष्यभर कारावास) ची शिक्षा सुनावली. यासोबतच, पीडित कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

हा खटला यशस्वी करण्यासाठी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय वल्टे, मुख्य तपास अधिकारी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, नायब तहसीलदार योगेश पाटील आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अत्यंत चोख कामगिरी बजावली.

न्यायालयीन क्षेत्रात अमळनेरचा ठसा; ॲड. किशोर बागुल यांची विक्रमी कामगिरी!

या खटल्याच्या निकालासोबतच अमळनेरचे नाव कायदे क्षेत्रात पुन्हा एकदा अभिमानाने वर आले आहे. शासकीय अभियोक्ता ॲड. किशोर बागुल यांनी आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत तब्बल ७३ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा मिळवून दिली आहे. ही कामगिरी न्यायालयीन वर्तुळात एक नवा आदर्श आणि मैलाचा दगड ठरली आहे.

गुन्हेगारांविरोधात कोणतीही कसर न सोडता ठोस तांत्रिक पुरावे आणि कायद्याचा सखोल अभ्यास मांडून त्यांनी अनेक पीडितांना न्याय दिला आहे. त्यांच्या या ऐतिहासिक आणि यशस्वी कामगिरीबद्दल कायदे क्षेत्रासह सामाजिक, राजकीय आणि सर्वसामान्य नागरिकांमधून त्यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. समाजात कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्यात आणि गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण करण्यात ॲड. बागुल यांचे हे योगदान अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!