डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग आवश्यक’; मारवड प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ उत्साहात साजरा……​मारवड गावात ‘शिवाजी चौक’ येथे स्टीकर लावून जनजागृती

 अमळनेर: भारतात डेंग्यू तापाचा प्रसार रोखण्यासाठी आणि लोकांमध्ये या आजाराविषयी व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी १६ मे रोजी ‘राष्ट्रीय डेंग्यू दिन’ पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर, प्राथमिक आरोग्य केंद्र मारवड यांच्या वतीने मारवड गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून डेंग्यू मुक्त गावासाठी संकल्प करण्यात आला. तसेच परिसर स्वच्छता आणि पाण्याचे भांडे झाकून ठेवण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले.

​सदर कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, जिल्हा हिवताप अधिकारी प्रमोद सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गिरीष गोसावी आणि तालुका आरोग्य पर्यवेक्षक प्रशांत फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. मारवड गावातील प्रमुख केंद्रबिंदू असलेल्या शिवाजी चौक येथे समस्त ग्रामस्थांना एकत्रित बोलावून, डेंग्यू जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध म्हणी व माहितीचे स्टीकर लावून ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ करण्यासाठी मोहीम राबवण्यात आली.

​“Community Participation Dengue Control: Check Clean and Cover”

​कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक आरोग्य सेवक योगेश कापडणे यांनी केले. प्रास्ताविकादरम्यान त्यांनी यंदाच्या वर्षाचे घोषवाक्य “डेंग्यू नियंत्रणासाठी लोकसहभाग: साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा” (Community Participation Dengue Control: Check Clean and Cover) स्पष्ट करून कार्यक्रमाची सुरुवात केली. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पुढाकाराने २०१० पासून या दिवसाची सुरुवात कशी झाली आणि पावसाळ्यापूर्वी (मान्सूनपूर्व) डासांची पैदास रोखण्यासाठी मे महिन्याचे काय महत्त्व आहे, याबाबत त्यांनी सविस्तर पार्श्वभूमी मांडली.

​डेंग्यूची लक्षणे आणि वेळीच उपचार

​कार्यक्रमाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. साहिल चौधरी यांनी क्लासिक डेंग्यू तापाची लक्षणे स्पष्ट केली. यामध्ये १०५°F पर्यंतचा तीव्र ताप, सांधे व स्नायू दुखणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे वेदना, त्वचेवर लाल पुरळ उठणे, मळमळ, उलट्या आणि तीव्र थकवा या लक्षणांचा समावेश आहे. डेंग्यूवर कोणताही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नसून, पुरेशी विश्रांती, योग्य हायड्रेशन (पाणी व द्रव पदार्थांचे सेवन) आणि वेळेवर डॉक्टरी सल्ल्याने उपचार घेतल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो, असे त्यांनी सांगितले.

​प्रतिबंधात्मक उपाय आणि चाचण्यांची माहिती

​आरोग्य सहाय्यक जितेंद्र मोरे यांनी डेंग्यूपासून संरक्षणाचे उपाय सांगताना; लांब बाह्यांचे व हलक्या रंगाचे कपडे घालणे, खिडक्या-दरवाजांना जाळ्या लावणे, कुलर, कुंड्या व छतावरील डबे यांमध्ये पाणी साचू न देणे आणि आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले.

​प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी के. आर. साबळे यांनी डेंग्यूच्या निदानासाठी केल्या जाणाऱ्या NS1 प्रतिजन चाचणी, IgM आणि IgG अँटीबॉडी चाचण्या, सीबीसी (रक्त पेशी व प्लेटलेट तपासणी) आणि पीसीआर चाचणीच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. आशा सेविका राजश्री पाटील यांनी डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या ‘एडिस’ डासाची उत्पत्ती कशी होते, हे डास प्रामुख्याने दिवसा व स्वच्छ-स्थिर पाण्यात कसे आढळतात, याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

​गृहभेटी आणि रक्तनमुने संकलन

​कार्यक्रम यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्या देवरे, आरोग्य सहाय्यिका सुनिता गावित, सेविका सरला परदेशी, औषध निर्माण अधिकारी विलास बिऱ्हाडे, हिरामण मेढे आदींनी परिश्रम घेतले.

​कार्यक्रम संपल्यानंतर आरोग्य पथकाद्वारे मारवड गावात ठिकठिकाणी जनजागृतीपर पॅम्पलेट्स लावण्यात आले, तसेच आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गृहभेटी देऊन डासोत्पत्ती स्थानांची तपासणी केली. यादरम्यान गावातील तापाच्या रुग्णांचे त्वरित रक्तनमुने देखील संकलित करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशा सेविका संगीता चौधरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!