अमळनेरवर अन्याय! हक्काची कार्यालये शेजारील तालुक्यांत; ‘राजकीय वजना’अभावी तालुक्याची पीछेहाट 

विशेष बातमी…

   खान्देशातील शैक्षणिक पंढरी आणि व्यापारी केंद्र म्हणून नावलौकिक असलेल्या अमळनेर तालुक्यावर प्रशासकीय अन्याय होत असल्याची भावना जनसामान्यांत प्रबळ होत आहे. अमळनेरसाठी आवश्यक असलेली महत्त्वाची शासकीय कार्यालये शेजारील तालुक्यांना बहाल केली जात असल्याने, अमळनेरचे राजकीय वजन नेमके कुठे कमी पडतेय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत.

हक्काची कार्यालये गेली दुसऱ्यांच्या पदरात

अमळनेर हे दोन राज्यांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आणि मोठी बाजारपेठ आहे. मात्र, शासनाचे प्रमुख निर्णय घेताना अमळनेरला डावलले जात असल्याचे चित्र दिसत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे:

प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO): अमळनेरसाठी आवश्यक असलेले हे कार्यालय भडगाव येथे हलवण्यात आले.

अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय: नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांनी हे कार्यालय चाळीसगाव येथे उभारण्याचे जाहीर केले आहे.

वास्तविक पाहता, भौगोलिक विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता ही कार्यालये अमळनेरमध्ये होणे अपेक्षित होते, परंतु निर्णयांच्या या पळवापळवीमुळे स्थानिक जनतेत तीव्र संताप आहे.

दिग्गज नेतृत्व असूनही अंमळनेरकर ‘पोरके’

अमळनेर तालुक्याला खासदार आणि माजी मंत्र्यांचे वलय लाभलेले आहे. सत्तेत आणि प्रशासनात मोठा प्रभाव असूनही, अमळनेरच्या हक्काचे प्रकल्प आणि कार्यालये इतर तालुक्यांत कशी काय जातात? असा प्रश्न आता नागरिक उपस्थित करत आहेत. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तालुक्याला ‘अप्पर पोलीस कार्यालय’ आणि ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया’ची नितांत गरज असतानाही केवळ राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे हा लाभ मिळत नसल्याचे बोलले जात आहे.

नागरिकांचा इशारा

व्यापारी, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमळनेरची प्रशासकीय कोंडी होत आहे. जर महत्त्वाची शासकीय कार्यालये येथे आली नाहीत, तर भविष्यात नागरिकांचा हा असंतोष आंदोलनाच्या स्वरूपात रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावरील नागरिकांना न्यायासाठी आता किती काळ वाट पाहावी लागेल, हाच मुख्य प्रश्न आहे.

प्रा डॉ एल ए पाटील, माजी प्राचार्य, प्रताप महाविद्यालय अमळनेर

 साने गुरुजींची कर्मभूमी, ॲडिशनल डिस्ट्रिक्ट कोर्ट, विभागीय प्रांत कार्यालय असलेल्या, सॉफ्टवेअर क्षेत्रातील नामांकित विप्रो सारख्या जगद्विख्यात कंपनीला निर्माण करणाऱ्या माननीय श्री अझीम हाशिम प्रेमजी (Azim Premji) सारख्या जागतिक कीर्तीच्या उद्योगपतींचा दैनंदिन संपर्क असलेले शहर, उच्च दर्जाचे रेल्वे कॉरिडॉर, खान्देशातील शैक्षणिक पंढरी आणि व्यापारी केंद्र म्हणून नावलौकिक असलेल्या दोन राज्यांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण आणि मोठी बाजारपेठ असलेल्या अमळनेर शहरात शासकीय व्यवस्थांबरोबर, कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारी समर्थ आणि सक्षम यंत्रणा असणे अत्यावश्यक आहे. अमळनेर शहराची ऐतीहासिक पार्श्वभूमी आणि विद्यमान गरज लक्षात घेता नवीन शासकीय कार्यालये अमळनेरात यावीत. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या तालुक्याला ‘अप्पर पोलीस कार्यालय’ आणि ‘अप्पर जिल्हाधिकारी कार्यालया’ची नितांत गरज असतानाही या सुविधा अमळनेरला का उभारल्या जात नाही असा प्रश्न पडतो? मा आमदार श्री अनिल दादा पाटील यांच्या निमित्ताने या तालुक्याला मंत्रिपद प्राप्त झाले. मा श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या निमित्ताने आदर्श संसद पटू संसद सदस्य या शहराने दिलेत. या मंडळींनी हे विषय मनावर घेतले तर अमळनेर शहराला या सुविधा सहज प्राप्त होतील अशी खात्री आहे. जनतेच्या दैनंदिन व्यवहाराशी संबंधित असलेल्या कार्यालयांची निर्मिती अमळनेर शहरात होण्यासाठी माननीय आमदार व माननीय खासदार यांनी लक्ष घालावे अशी प्रामाणिक अपेक्षा व विनंती सर्वसामान्य जनतेच्या वतीने आहे.

————————————————

प्रा डॉ रविंद्र हिरालाल चौधरी, संचालक,हिरा उद्योग समूह….

 मतदार संघाचा लोकप्रतिनिधी अत्यंत अकार्यक्षम असल्या कारणाने तसेच प्रशासकीय कुठलेही नॉलेज नसल्याकारणाणे इतर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आपल्या तालुक्यात कार्यक्षमता वाढवावी तसेच रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून चहुबाजूने नजर ठेवून शासकीय आणि प्रशासकीय कार्यालय आपल्या मतदारसंघांमध्ये नेऊन एक प्रकारे रोजगाराची आणि जनतेची सेवा करीत आहेत.

————————————————-

 श्री विश्वास पाटील, अध्यक्ष,गावरानी जगल्या सेना 

             

राजकीय वजना अभावी तालुक्याची नाही नुसतीच पीछेहाट इथे तर सर्वसामान्य गोरगरिबांची लागली आहे पूर्ण वाट 

आर.टी.ओ. कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शेजारी तालुक्यात जाणे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या वजनात फसवणूक व लूट करणाऱ्यां विरोधात साधी एफ. आय. आर. देखील अद्यापपावेतो नोंद न होणे तसेच अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत नोकर भरती प्रक्रियेस शासन स्तरावरून स्थगिती असतांना बेरोजगारांची फसवणूक करत आवेदन पत्र मागवत परीक्षा अमळनेर तालुक्या लगत असलेल्या धुळे जिल्ह्यात आयोजित करणे , गोरगरिबांना शासकीय कामकाजासाठी आवश्यक असलेला रुपये १०० /- चा स्टॅम्प पेपर १३० ते १४० /- रुपयांना विकला जाणे अशी शोषितांना त्रस्त करणाऱ्या शोषकांच्या शोषणाची लांबलचक यादी राजकीय वजनाची पीछेहाट झालेल्या बाबीचा प्रत्यय आणून देणारी आहे अर्थात अंमळनेर तालुका वासीयांवअन्याय करणारी आहे असेच वाटते .

————————————————-

श्री राहुल संतोष बिऱ्हाडे मा.शहराध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट, अमळनेर 

           

 अमळनेर सारख्या तालुक्याला हक्काची कार्यालये इतर ठिकाणी जाणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. म्हणजे विकासाच्या संधी कमी होणे होय. यामुळे शिक्षण, नोकरी आणि सुविधा यावर परिणाम होतो. अमळनेर येथे विकासाची गती कमी होत असल्याचे दिसते.

विद्यार्थी म्हणून माझे मत असे की, फक्त राजकीय वजन नव्हे तर स्थानिक पातळीवरील एकजूट योग्य मागणी आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचीही गरज आहे. तरुणांनी जागरूक होऊन आवाज उठवला तर विकास पुन्हा आपल्या तालुक्याकडे वळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!