अमळनेरमध्ये ‘पुतळा’ राजकारण तापलं! माजी आमदार आणि विद्यमान आमदारांच्या समर्थकांमध्ये चढाओढ

    अमळनेर: शहरात सध्या विकासकामांपेक्षा पुतळ्यांच्या राजकारणाची अधिक चर्चा रंगू लागली आहे. माजी आमदार शिरीष चौधरी आणि विद्यमान आमदार अनिल पाटील यांच्या समर्थकांमध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पुतळा उभारण्यावरून श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून, या ‘पुतळा पॉलिटिक्स’मुळे अमळनेरकर मात्र संभ्रमात पडले आहेत.

​नेमका प्रकार काय?

​    काल माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात स्व. अजितदादा पवार यांचा पुतळा उभारला जाईल, अशी घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली होती. या घोषणेला २४ तास उलटत नाही तोच, आमदार अनिल पाटील यांचे खंदे समर्थक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी आज मोठी घोषणा केली.

​    बाजार समितीच्या आवारात ‘शेतकरी’ रूपातील अजितदादांचा महाराष्ट्रातील पहिला पुतळा उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. एकाच नेत्याच्या पुतळ्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खमंग चर्चा सुरू आहे.

जनतेत मात्र नाराजीचा सूर

   ​एककीडे पुतळे उभारण्यासाठी दोन्ही गट सरसावले असताना, दुसरीकडे शहरातील मूलभूत सुविधांच्या दुरवस्थेवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

रस्त्यांची चाळण: शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

​स्वच्छतेचा प्रश्न: कचरा व्यवस्थापन आणि गटारींच्या प्रश्नामुळे नागरिक हैराण आहेत.

​पाणीपुरवठा: पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्यापही पूर्णपणे सुटलेला नाही.

​    “पुतळे उभारण्यापेक्षा नेत्यांनी शहराच्या विकासाकडे आणि रखडलेल्या प्रकल्पांकडे लक्ष दिले तर ते जनतेसाठी जास्त फायद्याचे ठरेल,” अशी चर्चा आता चौकाचौकात ऐकायला मिळत आहे. सत्ताधारी आणि विरोधक जाणीवपूर्वक मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून भावनिक राजकारण करत असल्याचा आरोप सामान्य अमळनेरकर करत आहेत.

पुतळ्याचे हे राजकारण आगामी जि.प. व प. सं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!