*लोक काय म्हणतील?…*
(करडी नजरेच्या वाचकांसाठी विशेष लेख)
★आयुष्यातील एक कप्पा असा असतो की, जो उघडून अलगदपणे त्यातील आठवणी आपण मोरपिसारी स्पर्शाने सुखदपणे अनुभवत धुंद होऊन जातो. पण त्याच वेळी एक कप्पा असा खचाखचपणे भरलेला असतो की, तो आपणाला कधीही बाहेर काढावा वाटत नाही.त्यामुळे प्रचंड अगदीकतेने, दुःखाने आपण व्याकुळ होतो , परंतु आपण ती गोष्ट कुणालाही सांगू शकत नाही आणि त्यामध्ये तुडुंब भरलेल्या असतो एकच प्रश्न, लोक काय म्हणतील? लोक काय म्हणतील?
माणसाचा जन्म झाल्या नंतर समजायला लागल्यापासून ते मरेपर्यंत सगळ्यात विध्वंसक, त्रासदायक ठरणारा व प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधी ना कधी सातत्याने छळणारा एकच प्रश्न तो म्हणजे
*लोक काय म्हणतील ?*
★खरोखरच आयुष्यभर आपण या प्रश्नात इतके अकंठ बुडालेले असतो की लोक काय म्हणतील या प्रश्नातील अनेक गोष्टीत आपणच हरवून जातो. आयुष्यामध्ये आहे या ठिकाणी थांबून ; थोडे मागे वळून पाहिले तर आपणास असे लक्षात येते की, आपल्या आयुष्यातले अनेक क्षण अगदी सहज; अलगदपणे निसटून जातात, पुन्हा वेचता न येण्यासाठी… फक्त आणि फक्त लोक काय म्हणतील या प्रश्नाचा विचार केल्यामुळे!
अगदी शाळा- कॉलेजमध्ये असल्यापासून आजतागायत जीवनातील अनेक क्षणाला आपण होकार दिला नाही, त्या क्षणांचा आपण स्वीकार केला नाही ही गोष्ट आयुष्यभर मनात सतत आपणास सलत असते. तो क्षण आजही आपणास तेवढ्याच तन्मयतेने अनुभवायचा असतो. त्यातील सुगंध दरवळत ठेवायचं असतो. पण तो क्षण आपण जगलेलाच नसतो… फक्त लोकांचा विचार करण्यामुळेच ! अनेक क्षण असेही असतात की ज्याला आपण ठामपणे नाकारच दिलेला नसतो. त्याचे अनेक दुष्परिणाम तो क्षण आयुष्यभर आपणाला भोगायला लावतो. तो नकार फक्त लोक भावनेचा आदर म्हणूनच आपण देत नाही ना !
अनेक संधी हातच्या निसटून गेल्या
★स्वतःला आवडणाऱ्या अनेक संधी आयुष्यामध्ये अशा आलेले असतात की, त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याची सुंदर स्वप्ने आपणाला हवी तशी सजवता येऊ शकतात. स्वतःचं अस्तित्व त्यातूनच आपण सिद्ध करू शकतो आणि आयुष्यातलं सगळं आत्मिक सुख, समाधानही आपण त्यातून मिळवू शकतो. स्वतःच्या आवडीच्या करिअरच्या अनेक शिड्या अशा अगदी समोर उभारलेल्या असतात. यशस्वी होण्यासाठी फक्त त्यावरती पाय ठेवून चढायला सुरुवात करायची असते आणि त्यावेळी फक्त आपल्या मनामधला विचार सोडायचा असतो की, लोक काय म्हणतील? त्या शिडी वरती चढून आपण यशस्वी होणार असतो. पण हे सारं निरर्थपणे जातं, लोक काय म्हणतील? या एका प्रश्नामध्येच आणि त्यातच आपण स्वतःचं अस्तित्वच गमावून बसतो.
नाते संबंधातील ठामपणा 🙅
★आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग येतात की स्वतःचे विचार, स्वतःचे समाधानाचा,आवड यांचा आपण काहीही विचार न करता सतत आपल्या इच्छा मारून आपण जगतो. नाते संबंधातील अनेक घटनेच्या वेळी आपण ठामपणे नकार किंवा होकारही देऊ शकलो नाही, स्वतःचे मन मारून नाते संबंध सांभाळत बसलो, त्यामध्ये स्वतःचे अस्तित्व कुठेही नव्हते. मात्र ही गोष्ट आयुष्यभर आपल्याला सतत छळत राहते. कारण फक्त एकच होतं की लोक काय म्हणतील ?
★खरंतर लोक काय म्हणतील हा प्रश्न पूर्वी होता, आताही आहे व पुढेही राहणारच! मात्र लोक काय म्हणतील? हा प्रश्न घालवणे म्हणजे भावनावर विजय मिळवणाऱ्या मनाच्या अवस्था हे आता आपण स्वीकारायला हवं. आपण जगाचा जरूर विचार करायला हवा. पण आपण जर बुद्धिमान असू, आपल्याला जीवनात काहीतरी चांगले करू इच्छितो, आपल्या ह्या इच्छा प्रामाणिक असतील व त्या गुणवत्ता पूर्ण आपण सिद्ध करू शकत असू, तर लोक काय म्हणतील ? अशा निरर्थक वाक्यावर विचार करून आपण अजिबात वेळ दडवू नये. आपणास हव्या त्या गोष्टी आपण साध्य करायला तयारच राहायला हवं, त्यातूनच आपण आपल्या जीवनाचा आस्वाद घ्यायला हवा.
★लोक काय म्हणतील हा तोंडातून बाहेर पडणारा हवेचा एक बुडबुडाच ! या प्रश्नाने स्वतःचे व समाजाचे कधीही कल्याण होणार नाही.संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या सह सर्वच संत, राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक महान विभूतींनीलोक काय म्हणतील? या प्रश्नाचा विचार केला नाही म्हणूनच आपल्या आयुष्यामध्ये त्या सर्वश्रेष्ठ ठरल्या व आजही आपण त्यांच्या आदर्श व्रत मार्गावर चालत आहोत.
★लोक काय म्हणतील? या एका प्रश्नामुळे आपण स्वतःचे सुप्त गुण, इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून आपले जीवन नाईलाजाने, मन मारून व्यतीत करतो. त्यातून अनेक हाल अपेष्टा, समस्या निर्माण होतात व आपणास त्याची तोटे आयुष्यभर भोगावे लागतात. परंतु हे लोक आपली जवळची माणसं नसतात हे प्रथम आपण लक्षात घ्यायलाच हवं!*
★समोरचे लोक आपल्यासाठी कोण आहेत?त्यांचे कर्तृत्व काय? ते कोणत्या परिस्थितीमध्ये आपणाला असे बोलतात ! त्या बोलण्याचा फायदा तोटा आपल्या आयुष्यामध्ये काय? या गोष्टीचा आपण विचार करायलाच हवा.
★खरं तर लोकनिंदेला घाबरून आपण आहे त्याच ठिकाणी राहतो आणि लोक मात्र आपणाला तिथेच सोडून लांब पुढे निघून गेलेले असतात.लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार न करता आपल्या स्वतःचे स्वप्न आपण स्वतः पूर्ण करायला हवं. त्यासाठीही काही गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व द्यायला हवंच.
त्यामध्ये विचार करायला हवा :-
1) आयुष्यामध्ये स्वतःला प्राथमिकता द्यायला हवी.
2) स्वतःची किंमत आपण स्वतःच करायला हवी.
3) कोणतेही काम आपण निष्ठा पूर्वक करून आत्मविश्वासी बनायला हवे
4) आयुष्यामध्ये आपण दुसऱ्यांना जज करणं सोडून द्यायला हवं.
5) आपल्यावर प्रेम करणाऱ्या व आपणास पाठिंबा देणाऱ्या माणसातच आपण सतत राह्यला हवं.
लोक काय म्हणतील? या प्रश्नाला आपण आत्तापासूनच बसनात गुंडाळून ठेवून आपल्या आयुष्याची प्रगती, आपल्या आयुष्यातील आनंद आपण घेत तो सभोवतीही उधळत जायला हवं, मग करताय ना याची सुरुवात…
💝🎊💝🎊💝🎊💝🎊💝🎊💝🎊💝
